वृत्तसंस्था प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाने शेतक-यांसह सामान्यांचेही कंबरडे मोडले आहे, अशा स्थितीत बारामती, इंदापूर व दौंड या तीन तालुक्यातील काही जणांना भूसंपादनाच्या माध्यमातून भरपाईचे पैसे प्राप्त होणार आहे.
आगामी दोन महिन्यात या तीन तालुक्यात तब्बल 486 कोटी रुपयांचे वाटप निव्वळ नुकसानभरपाई पोटी होणार असल्याने या तिन्ही तालुक्याच्या अर्थकारणाला काही प्रमाणात गती येईल अशी चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मार्ग वेगाने पूर्ण व्हावा या साठी पुढाकार घेतला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकांनंतर आता निधीची अडचण दूर झाली आहे. स्वताः पवार सातत्याने या बाबतचा आढावा घेत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाला आता गती प्राप्त होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाच्या कामासाठी बारामती, इंदापूर व दौंड या तीन तालुक्यातील गावातील काही जमीनींचे संपादन करायचे आहे. या साठी 385 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील नऊ व दुस-या टप्प्यातील सोळा अशा एकूण 25 गावातील जमींनीचा मोबदला आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे.
बारामती तालुक्यातील उंडवडी कडे पठार, उंडवडी सुपे, गोजुबावी, सावंतवाडी, बारामती एमआयडीसी, तांदुळवाडी, कटफळ, वंजारवाडी, रुई, सावळ, जळोची, पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, काटेवाडी या भागातील रस्त्यालगतच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे.
- कामगारांसाठी ब्युरो स्थापन करणार, तर धमकविणाऱ्यांविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले...
सध्याचा असलेला हा दोन पदरी मार्ग चार पदरी होणार आहे. पुणे सोलापूर रस्त्यावरुन बारामती बाजूकडे वळण घेतल्या नंतर थेट इंदापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा चार पदरी रस्ता होणार आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान वारक-यांची गैरसोय होत होती. ही बाब विचारात घेऊन या रस्त्याच्या चार पदरीकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे.
आता भूसंपादनापोटीची रक्कम संबंधिताना देण्याचे काम दोन टप्प्यात होणार असून आगामी दोन महिन्यात ही रक्कम देण्यात येणार आहे. या बाबतची प्रक्रीयाही सुरु झाली असून 385 कोटी रुपये जमा असल्याने निधीची अडचण नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.