कलाकारांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना मनसे देणार दणका:- अभिजीत पानसे



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह रजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. सुशांतसिंह राजपूतसारख्या कलाकारांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे का? यावर मनसेची चित्रपट सेना अभ्यास करत आहे. असा प्रकार खरच होत असेल तर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात येईल किंवा त्यांचे चित्रपटच तयार होऊ देणार नाही, असा इशारा मनसे नेते व दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी दिला. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे प्रकार होत नसल्याबद्दल पानसे यांनी समाधान व्यक्त केले.

उत्कृष्ट कलाकार असलेल्या सुशांतसिंह रजपूतने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. काही लोकांची यासंदर्भात चौकशी देखील होत आहे. मात्र, चौकशी केली तरी एकदा गेलेला माणूस परत येणार नाही. त्यामुळे चांगल्या कलाकारांवर आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन पानसे यांनी सांगितले.

खऱ्या कलाकाराचे पैश्यांपेक्षा कलेवर जास्त प्रेम असते. जर तेच त्याला करू दिलं नाही, तर त्याचा स्फोट होतोच. बदला म्हणून एखाद्याला इंडस्ट्रीच्या बाहेर काढणे हा गुन्हा आहे. जे चांगले काम करतात त्यांना संधी मिळालीच पाहिजे, असे पानसे म्हणाले. कलाकारांसाठी मनसे चित्रपट सेना काम करत असून चांगल्या कलाकारांना कायमच पाठिंबा देणार, असेही पानसे यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा फटका मराठी इंडस्ट्रीलाही

लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून इंडस्ट्रीतील कामे बंद आहेत. मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकार, तंत्रज्ञ या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. बंद झालेल्या कामांमुळे हातावरचे पोट असणार्‍यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा वेळेस या इंडस्ट्रीला वाचविण्यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे मत अभिजीत पानसे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget