राजू शेट्टी होणार आमदार; शरद पवारांनी दिली ऑफर



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव दिला आहे. याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर त्यांचे भाजपाशी संबंध बिघडले. त्यांनी मोदी-भाजपावर टीकेचा प्रहार सुरू केला. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते. मागील लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अपयश आले. लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह महा विकास आघाडीकडे धरला होता.

अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत स्वाभिमानीच्या मागणीकडे दोन्ही काँग्रेसने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे स्वाभिमानी कडून नाराजी व्यक्त केली गेली होती. आता राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ तालुक्यातील निवासस्थानी भेट घेतली.  या भेटीबाबत शेट्टी म्हणाले, गेली काही दिवस आईची प्रकृती खराब होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जयंत पाटील घरी आले होते. याच वेळी काही राजकीय चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेत राज्यपाल कोट्यातून एक जागा देण्याचे सूतोवाच केले आहे. याबाबत स्वाभिमानीच्या कार्यकारणी चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेट्टी आणि खोत

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या पासून फारकत घेतल्यानंतर ते भाजपकडे झुकले होते. भाजपने त्यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली होती. मात्र तेव्हा त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी न देता भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज भरायला लावला होता. यामुळे तांत्रिक दृष्ट्या सभागृहांमध्ये खोत हे भाजपचे आमदार म्हणूनच होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेट्टी यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्या वर शेट्टी हे स्वाभिमानीचे उमेदवार असणार? की राष्ट्रवादीचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत शेट्टी यांनी सांगितले की, ‘आता राज्यपाल कोट्यातून आमदार निवडले जाणार आहेत. त्यामुळे त्यावर कोणता राजकीय शिक्का असणार नाही. स्वाभिमानीची स्वतंत्र प्रतिमा घेऊनच सभागृहांमध्ये जावे लागेल. खरे तर मला दिल्लीमध्ये लोकसभा व राज्यसभा मध्ये काम करायला आवडले असते. परंतु लोकसभा निवडणुकीला अवधी असून राज्यसभा निवडणूक पुढील दोन-अडीच वर्षात होणार नाही. तसेच मी रिकामा न राहता कोणत्या तरी सभागृहाचा सदस्य असावा असे महाविकास आघाडीत वाटत आहे. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून हा प्रस्ताव आला आहे. काँग्रेसकडून मात्र असा कोणताही प्रस्ताव आला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी राष्ट्रवादीकडून आलेल्या ऑफर बाबत एक- दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असेही नमूद केले.

मात्र, जयंत पाटील यांचे शेट्टी यांच्या घरी स्वतःहून जाणे आणि दोघांमध्ये झालेले गुप्तगू पाहता शेट्टी यांचा विधानपरिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कोणतेही लोकप्रतिनिधी पद नसलेल्या शेट्टी यांना पुन्हा यानिमित्ताने संधी मिळताना दिसत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget