पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 31 जुलैपर्यंत दर्शनकरिता बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे 17 मार्च ते 15 जुलै या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. तथापि, राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरातदेखील कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंदिर समितीने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर हे 31 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, श्री विठ्ठल-रूक्मिणीचे नित्योपचार, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धूपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत.
तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचे पत्रक श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी, गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), अॅिड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांच्याशी विचारविनिमय करून एकमताने निर्णय घेतल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.