वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोल्हापूर-लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात उगम झालेला आणि नंतर राज्यभर चर्चेत आलेला शब्द म्हणजे ‘आमचं ठरलंय’. गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून आलेला हा शब्द पुढे राजकीय चालीचा भाग झाला, आता तर त्यांच्याच कार्यकर्त्याकडून ‘आमचं ठरलंय’ या नावानं पक्षही स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली असून मान्यतेची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने माजी खासदार व सध्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. महाडिक यांच्याशी असलेल्या राजकीय वादामुळे गृहराज्यमंत्री पाटील यांनी त्यास विरोध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असल्याने या विरोधावर मर्यादा येत होत्या. तेव्हा राजकीय खेळीचा एक भाग म्हणून ‘आमचं ठरलंय’ या शब्दाचा उगम झाला. खासदार प्रा. संजय मंडलिकांना पाठिंबा आणि महाडिक यांना विरोध हा या शब्दाचा राजकीय अर्थ. हा शब्द नंतर एवढा चर्चेत आला की, लोकसभा आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रत्येक नेते आणि कार्यकत्यांच्या तोंडात हाच शब्द होता. लोकसभेनंतर विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘आमचं ठरलंय’हा शब्द वापरला.
लोकसभा निवडणुकीत खुद्द शरद पवार यांनी देखील या शब्दाची दखल घेतली होती. राजकीय रणनीती म्हणून या शब्दाला या काळात वजन आले. सतेज पाटील यांच्या या शब्दाचा अर्थ कार्यकर्त्यांना पक्का समजला. त्यानुसार कृती केली. पुढे विधानसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’ म्हणत ऋतुराज पाटील यांनी प्रचार केला. ते आमदार झाले. यामुळे पाटील गटाला हा शब्द अतिशय जवळचा झाला. पुढे राज्यभरात त्याचे अनेक ठिकाणी अनुकरण झाले असले तरी त्याचे पेटंट मात्र कोल्हापूरकडेच राहिले.
या सर्व पार्श्वभूमीवर आता ‘आमच ठरलंय विकास आघाडी’ या नावाने नवीन पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहराज्यमंत्री पाटील यांचे समर्थक प्रमोद पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे त्याच्या नोंदणीसाठी कागदपत्रे सादर केली. त्यानुसार आयोगाने हरकती मागवल्या आहेत. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला अधिकृत मान्यता मिळेल. कोल्हापुरात अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. अशा वेळी या आघाडीच्या वतीने हा गट निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे ताराराणी आघाडीचा या पद्धतीने अनेक वर्षे वापर करतात. तीच चाल गृहराज्यमंत्री पाटील यापुढे खेळण्याची चिन्हे आहेत. आगामी गोकुळ दूध संघ व राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्याची झलक दिसण्याची शक्यता आहे.
पुढं काय काय ठरणार?
कोल्हापुरात 'आमचं ठरलंय' म्हणत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मदत केली. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवले. या पद्धतीने महाविकास आघाडी ची सुरूवात कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ म्हणत झाली होती. आता पुढे आणखी काय काय ठरतंय याबाबत उत्सुकता आहे.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.