वृत्तसंस्था // प्रतिनिधी
चीनकडून भारत सीमारेषावर झालेल्या घुसखोरीनंतर भारताने चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे (Deployment of Rafale on India China border). याचाच भाग म्हणून भारताने फ्रान्सकडून येणारे अत्याधुनिक राफेल युद्धविमाने भारत-चीन सीमेवर तैनात करण्याची तयारी सुरु केली आहे. याबाबत सैन्याच्या वरिष्ठ पातळीवर बैठका होत आहेत. भारताला फ्रान्सकडून 27 जुलै रोजी राफेलची पहिली खेप मिळणार आहे. याची अंबाला वायुसेना स्टेशनवर तैनाती करण्यात येणार आहे.
फ्रान्सकडून भारताला पहिल्या खेपेत एकूण 6 राफेल युद्धविमानं मिळणार आहेत. त्यामुळे लडाखमधील भारतीय वायूदलाची शक्ती वाढणार आहे. हवाईदलाचे प्रमुख आर. एस. भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली 22 आणि 23 जुलैला हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यात फ्रान्समधून भारतात दाखल होणाऱ्या सहा राफेल युद्धविमानांच्या तैनातीवर मोठा निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, 15 आणि 16 जूनला भारत आणि चीनमध्ये हिंसक झटापट झाली होती. यानंतर भारत-चीनमधील तणाव बराच वाढला होता. तो कमी करण्यासाठी सैन्य आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. याबाबत जगभरातून प्रतिक्रिया आल्या. मात्र, चीनच्या कुरापती थांबणार नसल्याचं दिसत असल्याने भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवली आहे.
भारताकडून मिराज 2000 विमानांचा ताफा तैनात केला आहे. सुखोई 30, मिग 29 विमानं देखील तयार ठेवण्यात आली आहेत. अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे देखील सुसज्ज आहे. रात्रीच्यावेळी याच हेलिकॉप्टरच्या मदतीने सीमारेषेवर गस्त घातली जात आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.