सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ येत्या काही दिवसात संपत आहे. सध्या सर्वत्र निर्माण झालेल्या कोरोना संक्रमण काळात सरपंच निवडीसाठी निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यमान सरपंचाना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे.
जुलै महिना अखेर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ संपणार आहे. सध्याच्या काळात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यमान सरपंचांनाच काही काळासाठी मुदतवाढ मिळावी किंवा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमावयाचे झाल्यास प्रशासक म्हणून सोलापूर जिल्हातील विस्तार अधिकारी किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आमदार सुभाष देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा ग्रामविकास मंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निर्णयाला विरोध फक्त भाजपनेच केला आहे असे नाही तर वंचित ने देखील या निर्णयाला विरोध केला आहे. ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे अश्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याने हे घटनाबाह्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रशासक नेमायला आमचा विरोध असून निवडणूक घेता येत नसतील तर आहे त्या ग्रामपंचायतीलाच सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांकडे केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.