महाराष्ट्रातील 55 वर्षांवरील सर्व नागरीकांची तपासणी होणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे




 वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पुढील महिन्यात चेस द व्हायरसचा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत ५५ वर्षावरील सर्व नागरिकांची यात तपासणी करण्यात येणार असून ज्यांना ह्दयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.


सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १० ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आज झाला ,याप्रसंगी ते बोलत होते.


महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टिने सदृढ महाराष्ट्र घडवूया, स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन, परस्पर सहकार्याने काम करुन कोरोनाला नक्की हरवू या असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.


कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली.


मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.


आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून आपण दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु कक्षात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना करता येईल.जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.दुर्गम भागात सेकंड ओपिनिएन हवे असेल, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर मुंबई पुण्याचाच नाही तर जगभरातील तज्‌ज्ञांची सेवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येईल असेही ते म्हणाले.


यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर ,आमदार राजेश पाटील , माजी आमदार चंद्रदीप नरके ,जिल्हाधिकारी दौलत देसाई , महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी आभार मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget