वृत्तसंस्था // प्रतिनिधी
प्रणव मुखर्जी हे देशाचे आणि काँग्रेस पक्षाचे हे आधारस्तंभ होते. मी त्यांना 1983 पासून ओळखतो. ते देशाचे अर्थमंत्री होते आणि मी तेव्हा राज्याचा अर्थमंत्री होतो. तेव्हापासून त्यांच्याशी माझे जवळचे संबंध राहिले आहेत. त्यानंतर मी जेव्हा देशाच्या राजकारणात गेलो, केंद्र सरकार मध्ये मंत्री, राज्यपाल, लोकसभेचा नेता अशा अनेक पदावर काम करताना त्यांच्याशी जवळून संबंध आला. माझ्या राजकीय घडामोडीत त्यांच्याशी अनेक वेळा भेट होत असत. तेव्हा ते मला मोठा आधार होते. ते जेव्हा राष्ट्रपती म्हणून निवडून गेले, तेव्हा लोकसभेत रिक्त झालेल्या लोकसभेचा नेता या त्यांच्या जाागी माझी लोकसभेचा नेता म्हणून निवड झाली. तसेच ग्रुप ऑफ मिनिस्टर मंत्रिगटाच्या जवळपास चाळीस-पन्नास बैठका होत असत, त्यावेळी ते प्रमुख म्हणून मार्गदर्शक असायचे. अनेक संकटाच्या प्रसंगी बैठकांमध्ये चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढून द्यायचे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा आधार वाटायचा. हुशार असणारा हा नेता होता. संपूर्ण देशाची, राजकारणाची आणि घडामोडीची माहिती असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ते सोलापूरला आले. त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच निर्मलकुमार फडकुले सभागृहातचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मी निर्भया प्रकरणामुळे त्यांच्यासोबत उपस्थित राहू शकलो नाही. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी या दोन्ही संस्थांचा लोकार्पण सोहळा केला होता. मला ते नेहमीच मार्गदर्शन करायचे.
ज्या वेळी सोनिया गांधींनी माझी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून निवड केली. त्यावेळी काँग्रेसच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून प्रणव मुखर्जी हे स्वतः आले होते. त्यांच्या उपस्थितीतच माझी मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. काँग्रेससाठी आणि केंद्र सरकारमध्ये ते संकटमोचक म्हणून काम करत राहिले. काँग्रेस हा आत्मा आहे असे ते मानत. तो वाचविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. काँग्रेसची जी आजवरची अधिवेशने झाली, त्या अधिवेशनात झालेल्या सर्व ठरावांची माहिती पुढच्या पिढीला व्हावी म्हणून त्यांनी पुस्तकामध्ये लिहून काढली. प्रणव मुखर्जी एक सर्वमान्य नेते होते सोलापूर येथे आले होते. सोलापूरकर त्यांना कधीही विसरू शकणार नाहीत. ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन सोलापूर कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या जाण्याने त्यांची उणीव जाणवत राहील त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.