वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यात आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताने धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व आरक्षणाच्या मागणीसाठी पत्र लिहिण्याचा आंदोलन केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपची सत्ता असताना पंढरपूरला आले होते. यावेळी धनगर आरक्षण कृती समितीने त्यांची भेट घेऊन धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण स्वतः लक्ष घालून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू आणि इतर मागण्यांची देखील दखल घेऊन त्यावर कारवाई करु असं आश्वासन दिलं होतं.
मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपदी खुद्द उद्धव ठाकरे हे विराजमान झाले. धनगर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप सध्या धनगर समाजाच्या नेत्यांकडून होतो आहे. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ही जाणून बुजून प्रलंबित ठेवला जातोय असा आरोप आता होऊ लागला
आज पंढरपूरमध्ये धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर यांच्यासह अनेक धनगर युवकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यामध्ये धनगर समाजास तात्काळ आरक्षण मिळावे, मेंढपाळ बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यात यावेत आणि धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी अशा प्रमुख मागण्या या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
या पत्राची मुख्यमंत्री व राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास या रक्ताची किंमत या महाविकास आघाडीला चुकवावी लागेल असा इशारा यावेळी माऊली हळणवर यांनी दिला आहे. त्यामुळे यावर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात आणि काय पाऊलं उचलतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.