वृत्तसंस्था // प्रतिनिधी
धरणपाणलोट क्षेत्रासह कोल्हापूर जिह्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना, राधानगरी, वारणासह धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 24 तासात सहा फूटाने वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरातील कमी झालेले पाणी पुन्हा एकदा वाढल्याने चालू मौसमातील दुसरा दक्षिणदार सोहळा झाला आहे.
निम्म्या मंदिराला कृष्णेचा वेढा पडला आहे. कुंरूदवाड-अनवडी, कुंरूदवाड-शिरढोण दरम्यान असणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठलगत असणारी वैरण पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आणखी पाणी वाढल्यास नागरी वस्तीत पूराचे पाणी येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यां पैकी चार दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. यातून व वीज गृहातून 7056 इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. दरम्यान काळम्मावाडी धरण 95 टक्के भरले असून याचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 5886 क्यूसेक व विजगृहातून 1800 असा 7686 क्यूसेकचा विसर्ग केल्याने दुधगंगासह भोगावतीच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.