वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (बुधवारी) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचं कळतंय.
राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतलं जाईल, असंही बोललं जात आहे.
एकीकडे भाजपचे नेते पार्थ पवार यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर टोला लगावत असतानाच राष्ट्रवादी ही व्यूवरचना आखत आहे. त्यामुळे आता भाजपला डॅमेज कण्ट्रोलसाठी प्रयत्न करावे लागणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
'आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असतील तर आम्ही काही असं जाहीररित्या सांगणार तर नाही ना! जर भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन त्यांना यावं लागेल, ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.