मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेशात वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी चार वाजता तातडीची उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे कळते. मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करतानाच मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर आता जवळपास सर्वच भागांत वीज पुरवठा सुरळीत झाला असून आता हा प्रकार नेमका घडला कशामुळे?, याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ४ वाजता वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता उपस्थित राहणार आहेत.वीज पुरवठा खंडित होऊन जो अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला त्याला नेमकं कोण जबाबदार आहे?, हा केवळ तांत्रिक दोष आहे की, यामागे दुसरे काही कारण आहे?, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कोणती खबरदारी घ्यायला हवी?, या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.