'ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला. याची मुदत रविवारी संपत असून सोमवारपासून राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व व्यापार, उद्योग सुरू करणार असल्याचा निर्धार चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी शुक्रवारी बोलून दाखविला.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाने यापूर्वीच सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी देत 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला.
या काळात दूध, भाजीपाला विक्रीला पोलिसांकडून अटकाव होत आहे. महापालिका प्रशासनाने भाजीपाला घरपोच मिळेल असे सांगितले. पण त्यादृष्टीने फारसे नियोजन केले नाही. दूध घरपोच देणारी यंत्रणा अपुरी असल्याने नागरिकांना दूध आणायला बाहेर पडावेच लागते. पण अशा नागरिकांवरही पोलिस कारवाई करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे.
किती नुकसान सहन करायचे?
कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार उद्योग अगोदरच अडचणीत आहे. पण कोरोनाची चेन तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला 23 मे पर्यंत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी ही मुदत संपत आहे. वर्षभरापासून आम्ही नुकसान सहन करत आहोत. आता अजून नुकसान सहन करण्याची व्यापार्यांची मानसिकता नाही. राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करून सोमवारपासून सकाळी 7 ते 11 या वेळेत जिल्ह्यातील सर्व व्यापार व उद्योग सुरू करणार असल्याचे संजय शेटे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.