29 जून ते 2 जुलै हे चार दिवस पंढरपूर मध्ये संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आहे.




पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपूर कोरोनामुळे यंदा आषाढीसाठी भाविकांना पंढरपुरात येता येणार नसल्याने पोलीस प्रशासनाने 29 जून ते 2 जुलै हे दरम्यान चार दिवस पंढरपूर शहर व आजुबाजूच्या 10 किलोमीटर परिसरात गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. दरम्यान भाविकांनी आता पंढरपूरला येण्यासाठी आग्रह धरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याबाबतची माहिती अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढलेला असून सोलापूर शहर व ग्रामीण भागात ही रूग्ण रोज वाढत आहेत. यासाठी खबदारीचा उपाय म्हणून आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. बाहेरून कोणीही पंढरपूरला येवू नये असे आवाहन करण्यात आले असून यासाठी जिल्हापातळीवर त्रिस्तरीय नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. शहर व ग्रामीण भागातील मठ, धर्मशाळांना बाहेरून येणार्‍यांना वास्तव्यास मनाई करण्यात आली आहे तर शहरातील नागरिकांना ही बाहेरच्या व्यक्तींना घरात ठेवून घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जर असे कोणी केल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आषाढी एकादशी 1 जुलै रोजी असून सध्या काही भाविक हे दुचाकी गाड्यांवरून पंढरीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा काहींना शहरात येण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान आता पोलिसांनी चार दिवस संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. 29 जून ते 2 जुलै दरम्यान ही संचारबंदी लागू करण्याचा हा प्रस्ताव आहे.
लॉकडाऊनमुळे 17 मार्च ते 30 जून दरम्यान विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंदच आहे. आता ही वारी काळात श्री विठ्ठल मंदिर बंदच राहणार असून वारकरी भाविकांनी यंदा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही पंढरपूरला येवू नये. पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीला बंद करण्यात आल्याने शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व रस्त्यांवर बॅरेगेटिंग करण्यात आले आहे. तसेच 1500 पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ही येथे तैनात करण्यात आला आहे.
येथे आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे रोज थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे. तसेच प्रत्येक कर्मचार्‍याला दहा मास्क, एक सॅनिटायझर बाटली, चार ओआरएस पावडर पॅकेट, व्हिटॅमिन सी तसेच फेसशिल्ड रेनकोट व ओडोमास देण्यात आला आहे. याचे वितरण अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक अरूण पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget