वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यात जनतेला कोरोनाचं संकटासोबतच महागाईच्या भस्मासुराचाही सामना करावा लागत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यात वीज कंपनीनं मोठ्या रकमेचं वीज बिल पाठवून ग्राहकांना एक प्रकारे 'शॉक' दिला आहे. या संदर्भात मात्र मंगळवारी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
ग्राहकांना 3 महिन्यांचं बिलं हप्ता पद्धतीनेही भरता येणार आहेत. या हप्त्यांवर कोणतंही व्याज नसेल. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर 100 युनिट वीज मोफत देण्याबद्दल विचार केला जाईल, असं ऊर्जा नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे.
ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसात वीज बिलांचे आकडे ऐकून ग्राहकांना धक्का बसला आहे. ग्राहक वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये लोकं गर्दी करत असल्याचंही दिसत आहे. पण वीज कंपनीनं कोणालाही वाढवून वीज बिल पाठवलेलं नाही. लॉकडाऊनमध्ये घरातील सगळ्याच व्यक्ती घरी होते. त्यामुळे दिवसभर पंखा किंवा इतर स्वरुपात विजेचा मोठा वापर होता. या काळात वीज बिलं न मिळाल्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सुमारे 6000 कोटी रुपये कर्ज घ्यावं लागलं आहे. आमच्या ग्राहकांना अजिबात फसवलं नसल्याचं राऊत यावेळी म्हणाले.
लॉकडाऊनमध्ये वीज रीडिंग घेता येत नव्हतं आणि कोणाला बिलंही दिलं नव्हतं. वीज बिल दिलं असेल तरी कोणाचीही वीज तोडलेली नाही. ग्राहकांनी एसएमएसद्वारे रीडिंग पाठवा, अशी आम्ही सूचना दिली होती. मात्र, अगदी 2-3 टक्के लोकांनीच मीटर रीडिंग पाठवली होती. त्यामुळे 31 मे 2020 पर्यंतची बिलं आम्ही ढोबळमानाने पाठवल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.