वृत्तसंस्था // प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पकडलेल्या ९७ किलोच्या गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील जप्त गाडी ही परंडा येथील मीनाताई पाटील यांच्या नावाने ( मालकीची ) असल्याचे समोर आले असून उस्मानाबाद पोलिसांची २ पथके या फरार गाडी मालकिणीचा शोध घेत आहेत. मीना पाटील यांना यापूर्वी पुणे येथील एका दुकानात साडी चोरताना अटक केल्यानंतर त्यांची मनसे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र त्यानंतर तिचे धंदे सुरूच असल्याचे या गांजा तस्करी प्रकरणाने समोर आले आहे. साडीचोरी ते गांजा तस्करी या प्रवासाचे वर्णन लवकरच समोर येणार आहे. हा गांजा कुठून आणला होता व कुठे चालला होता ? तसेच ही गांजा तस्करी किती दिवसांपासून सुरु होती याचा तपास पोलीस करीत आहेत.
तुळजापूर तालुकयातील अणदूर गावाजवळ सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक MH 25 AL 9199 इनोव्हा गाडीमध्ये पोलिसांनी ९७ किलो गांजा जप्त करीत आरोपी बाळासाहेब परबत ( रा तडवळे ता माढा) व सोमनाथ कदम ( रा कदम वस्ती ता मोहोळ) यांना अटक केली . ९७ किलो गांजाच्या १९ लाख ५९ हजार २०० रुपयांच्या किमतीसह गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण ३४ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नळदुर्ग पोलीस ठाणे येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून या गुन्ह्यातील जप्त गाडी ही मीना पाटील यांची असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची २ पथके रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गांजाची गाडी पकडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून त्याचीही चौकशी सुरु आहे.
साडीचोरी प्रकरणाचा इतिहास –
पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील गोकूळ कलेक्शनमध्ये २०१८ साली उस्मानाबाद जिल्ह्याची रहिवासी असलेली मनसेची माजी महिला प्रदेश सचिव मीना पाटील हिला तिच्या २ मुलींसह ३० हजार रुपयांच्या साड्या चोरताना रंगेहात पकडण्यात आले होते.चोरीच्या साडीवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी केलेल्या या साडीचोरीचा व्हिडिओ महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला होता. दुकानात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याने या तथाकथीत ताईच्या साडी चोरीचा भांडाफोड केला होता त्यानंतर दुकानाचे मालक उमेश महेता यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. चोरी पकडल्यानंतर आरोपी महिला दुकानदाराला गयावया करू लागली. 40 हजार रुपये घ्या पण पोलिसांना बोलावू नका, असे म्हणत होती मात्र दुकान मालकाने पोलिसांना बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले व गुन्हा नोंद केला.
साडीचोरीच्या घटनेनंतर शालिनी ठाकरे यांनी तिची मनसे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा ट्विटद्वारे केली होती मात्र तिच्या पाठीशी ‘दिलसे’ असलेल्या ‘आबा’च्या साथीने तिने तिचे धंदे सुरूच ठेवले. तिच्या अनेक कारनाम्यात आबाचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.