पंढरपूर // प्रतिनिधी
महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्सचे हजारो रुपयांची कर्जे दिली आहेत. दरम्यान लाॅकडाऊनने महिला बचत गटांचे अनेक छोटे मोठे उद्योग व व्यवसाय ठप्प झाले आहेत.अशा परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने मायक्रो फायनान्सने दिलेली अल्पमुदतीची कर्जे माफ करावीत, अशी मागणी मनसेेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची भेट घेवून लेखी निवेदन दिले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात महिला बचत आहेत. गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय करुन महिला आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. महिला बचत गटांनी उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध बॅंका आणि खासगी मायक्रो फायनान्सकडून हजारो रुपयांची कर्जे घेतली आहेत.
दरम्यान मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आहे. या काळात सर्वच उद्योग व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे महिला बचत गटाचेही उत्पादन ही थांबले आहे. उत्पादन थांबल्याने सर्रास महिला बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अशातच आता बचत गटांना दिलेल्या कर्जासाठी मायक्रो फायनान्सच्या अधिकार्यांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे. लाॅकडाऊन काळात उद्योग आणि व्यवसायिकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु यामध्ये महिला बचत गटांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर केली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गट सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत.
महिला बचत गटांचे मायक्रो फायनान्सचे कर्जे माफ करुन प्रत्येक बचत गटाला किमान 50 हजार रुपयांची मदत द्यावी,अशी मागणी ही मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार,सागर घोडके आदी उपस्थित होते.
कर्ज घेताना फायनान्स कंपन्यांनी संबंधीत महिला बचत गटातील महिलांचा विमा काढला आहे. विम्याची रक्कम त्याचवेळी दिलेल्या कर्जातून कपात करुन घेतली आहे.सध्या लाॅकडाॅऊनने बचत गटांचे उत्पादन देखील खराब झाले आहे. अशा प्रसंगी फायनान्स कंपन्यांनी उत्पादनांचे क्लेम करुन विमा मिळवून द्यावा अशी मागणीही श्री. धोत्रे यांनी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.