वृत्तसंस्था // प्रतिनिधी
उजनी व त्यावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस झाला नसला तरी उजनी धरण परिसरात होणार्या7 पावसामुळे गेल्या चार दिवसांत धरणाच्या पाणीपातळीत 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्रतिवर्षी पावसाळा सुरू होताच उजनीचे पात्र वजा पाणीसाठ्यातून कधी बाहेर पडणार याकडे लक्ष असते. त्यानंतर धरणात शंभर टक्के पाणीसाठा कधी होणार याकडेही सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असते. यंदा मात्र पाऊस चांगला होत असल्याने उजनी लवकर भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृग, आर्द्रा, पुनर्वसू तसेच आता पुष्य नक्षत्रातही होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या गतीने वाढ होत आहे.
यंदा मात्र मागील वर्षाच्या तुलनेत उजनीतील पाणीसाठा जास्त खालावला नव्हता. त्यामुळे पुढील कालावधीतही पावसाने असाच जोर ठेवला तर उजनी धरण लवकरच भरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उजनी धरणावरच सोलापूर शहरासोबतच नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. सीना माढा बोगदा, कॅनॉल व दहीगाव उपसा सिंचन योजनाही यावरच अवलंबून असल्याने सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतीचे भवितव्य उजनीवर अवलंबलेले आहे. त्यामुळे उजनी धरण हेच सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरते. परिणामी, अलीकडील काळात सोलापूर जिल्ह्यात ऊसशेतीसोबतच केळी, द्राक्षे यासारख्या फळबाग क्षेत्रातही वाढ झाली आहे.
उजनी धरण मागील आठ दिवसांतच वजा पाणीसाठ्यातून उपयुक्त पाणीसाठ्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत उजनी धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 4 हजार 652 क्युसेकचा विसर्ग मिसळत असल्याने उद्यापर्यंत उजनी धरणाची टक्केवारी आणखी 1 ते 2 टक्क्यांनी वाढणार आहे.
यंदा उजनीची पातळी वजा 25 टक्क्यांपर्यंत गेली होती. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाढण्यास सुरुवात झाली. आठ दिवसांत उजनीची पाणीपातळी वजातून उपयुक्त पाणीसाठ्यात आली आहे. आतापर्यंत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास 30 टक्के वाढ झाली आहे.
सध्याची पाणी पातळी
एकूण पाणीपातळी- 491.405 मी.
एकूण पाणीसाठा -1878.21 दलघमी
उपयुक्त पाणीसाठा -75.40
टक्केवारी - 4.95 टक्के

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.