वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आषाढी एकादशीस रायगडाहून पायी चालत आलेल्या शिवरायांच्या पादुकांना विठुरायाच्या दर्शनास पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करु दिला नाही. पंढरपुरानंतर आता दुर्ग रायगडही चढू दिला नाही. आता शिवछत्रपतींच्या पालखीस पंढरपुरात सन्मानाने जाऊन विठुरायाशी आपले हितगुज सांगून मगच राजधानी रायगड चढतील आणि आम्हीं शिवभक्त आत्मक्लेश म्हणून कठोर उपोषण करणार असल्याची माहिती शिवरायांच्या पालखीतील हुजरे डॉ. संदीप महिंद यांनी केली.
टाळेबंदी घोषित होताच लगेचच २८ मार्चपासून २९ जूनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, २ माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यमान राज्य मंत्रीमंडळातील ९ मंत्री, १३ खासदार, ३१ आमदार तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसह ७५-८० लोकांच्या भेटी; वेगवेगळे ११७ पत्रव्यवहार करुनही शिवछत्रपतींच्या पालखीविषयी अनास्था दाखविणाऱ्या या य शासनाचा निषेध करताना रायगड ते पंढरपुर पायी चालत गेलेल्या शिवभक्तांनी आत्मक्लेश म्हणून भूगाव ग्रामपंचायतीसमोर उपोषण करत असताना त्यांनी आज दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यासह सर्वच पक्षांचे मंत्री व पुढारी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका आल्यात हे माहित असूनही, त्यांना विसरुन-मागेच ठेवून स्वतः सगळे थेट मंदिरात घुसले. शिवरायांच्या अस्मितेपेक्षाही त्यांना स्वतःची खोटी प्रौढी महत्त्वाची वाटली. आणि शासकीय म्हणवल्या गेलेल्या पूजेचे सोपस्कार कशा दांभिक पद्धतीने उरकले गेले, त्याचेही अनेक किस्से आता उघड झाले आहेत. अशा शासनाला स्वतःची उरली-सुरली अब्रू वाचवायची असेल तर शिवरायांच्या पादुकांना सन्मानाने व अतीव आदराने पंढरीत नेऊन नगरप्रदक्षिणेसह सर्व प्रथा-परंपरा पाळून मगच विठुरायाच्या मंदिरात न्याव्या लागतील. भूवैकुंठीचे आराध्य भगवान पांडुरंगाच्या दर्शनभेटीशिवाय कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रायगडी जाणारच नाहीत.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.