वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान गेले काही महिने देशभरासह राज्यभरात लॉकडाऊन होतं. अजूनही अनेक शहरांमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन लावण्यात येत आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुनच कामे केली. तसेच या काळात त्यांनी मंत्रालयात उपस्थितीत राहणे टाळले. मात्र यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले. मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित राहत नाहीत. मातोश्रीच्या बिळात लपून बसले आहेत. असे मुख्यमंत्री हवेच कशाला? अशा प्रकारची टीका केली. आता याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनलॉक्ड मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रालयात कमीतकमी गेलो असा जो आरोप होतोय त्यात काही दम नाही. तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय. ही मुलाखत संपल्यानंतर मी घरी जाऊन माझ्या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहे. नुसते आयुक्तच नाहीत, तर सहआयुक्तही या बैठकीला असतील. हे रोजच चाललंय. मध्यंतरी मी मराठवाडय़ातील सर्व आमदारांशी चर्चा केली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक झाली, परवा विदर्भातील तिन्ही पक्षांच्या आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. म्हणजे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि मुख्य म्हणजे ताबडतोब निर्णय घेतोय.
फिरणं आवश्यक पण
पुढे ठाकरे म्हणाले की, फिरणं आवश्यक आहे. मी नाही म्हणत नाही. पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात. तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता. प्रवासाचा वेळ वाचतो. माझ्यावर आरोप करताहेत त्यांना माझा सवाल आहे, मग तुम्ही विमानाने कशाला जाता? बैलगाडीतून का जात नाही? बैलगाडीतून जा, पायी जा. तंत्रज्ञानाचा उपयोग करणार नसाल तर मग त्या तंत्रज्ञानाचा शोध लावता कशाला?

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.