वृत्तसंस्था // प्रतिनिधी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत एकूण पाणीसाठा 25.33 टीएमसी (87 टक्के) झाला आहे. आज सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग नऊ हजार 416 क्युसेकने वाढविण्यात आला आहे.
खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 25.33 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणीसाठा होता. वरसगाव पानशेत आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. गेल्या 12 तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 80 मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत प्रत्येकी 105 मिलिमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पाण्याचा येवा वाढल्यामुळे खडकवासला धरणातून आज सकाळी 11 वाजता विसर्ग पाच हजार 136 क्युसेकवरून नऊ हजार 416 क्युसेक करण्यात आला आहे. उजनी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर पोचला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.