राज्यातील कापूस खरेदीच्या अडचणीसंदर्भात पणन मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
वृत्तसंस्था प्रतिनिधी : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी शिवाय राहणार नाही, असे आश्वासन पणन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
कापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात पणन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.
श्री. पाटील म्हणाले, राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल तसेच दि कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत (सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागली तर अडचणी येणार नाहीत त्यासाठी या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असेही श्री. पाटील यांनी यावेळी संगितले
बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख, उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके, कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.