सोलापूर // प्रतिनिधी
लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या बळिराजाचे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे. दुधाला दरवाढ मिळाल्यानंतर आमदारकीचे बघेन, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच खरे शेतकरी असून, त्यांच्या माध्यमातूनच आतापर्यंत संघटनेच्या प्रत्येक आंदोलनास यश मिळाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
दूध दरवाढीच्या विषयावर शेट्टी यांनी सोमवारी (ता. 17) सोलापुरात आंदोलन केले. चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी मोर्चा काढला. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडविले. त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील एक कोटी 19 लाख लिटरपैकी तब्बल 52 लाख लिटर दूध शिल्लक राहात आहे. पाणी बाटलीस 20 रुपयांचा दर असतानाही दुधाला प्रतिलिटर 17 रुपयांचा भाव मिळत आहे. हॉटेल, चहा कॅन्टीन, शीतपेय विक्री बंद असल्याने अतिरिक्तत दुधाचे प्रमाण वाढले आहे. उत्पादन खर्च अधिक असतानाही बळिराजाला अपेक्षित दर मिळत नाही. 21 जुलैला लाक्षणिक संप करून राज्य सरकारला तोडगा काढण्याची विनंती केली होती. 5 ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वािसन देऊनही सरकारने काहीच तोडगा काढला नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसतानाही राज्यभर आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करावा, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी बंद करावी, भुकटीसाठी निर्यात अनुदान द्यावे, अशा मागण्या शेट्टी यांनी मोदी सरकारकडे केल्या.
राजू शेट्टी म्हणाले...
21 जुलैनंतर राज्य सरकारने तोडगा काढला असता, तर आंदोलनाची वेळच आली नसती
अडचणीतील बळिराजाला सरकारने दोन महिन्यांचे पाच रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे
दूध उत्पादकांना दोन महिने कालावधीतील अनुदानासाठी द्यावे लागतील सुमारे 150 कोटी
आंदोलने स्वाभिमानीच्याच झेंड्याखाली झाली यशस्वी : खरे शेतकरी स्वाभिमानीतच दिसतील
20 ऑगस्टला नगरमध्ये, तर 24 ऑगस्टला साताऱ्यात होणार दूध दरवाढीचे आंदोलन

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.