वृत्तसंस्था // प्रतिनिधी
करोनाच्या संकटामुळे सरकारनं संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाउन लागू केला होता. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात आहे. आता १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे.
देशात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ लागू होणार असून, सध्या अनेक राज्यांमध्ये अशंतः साप्ताहिक स्वरुपात लॉकडाउन लागू केला जात आहे. देशात करोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार सोशल डिस्टन्सिग आणि इतर नियमावली आखून देऊन १ सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देऊ शकते.
अनलॉक ३च्या वेळीच चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याची चर्चा होती. माहिती व प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात चित्रपटगृहांच्या मालकांचीशी चर्चा केली होती. मात्र, सरकारनं परिस्थितीचा आढावा घेऊन सुरू करण्यास मूभा दिली नव्हती.
अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देण्याचं वृत्त असलं, तरी मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास दिली जाण्याची शक्यता कमी आहे.
१ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वार मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. या काळात मेट्रोच्या एका बोगीमध्ये केवळ ५० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असणार आहे. मुंबईत यापूर्वीच अत्यावश्यक सेवेती कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना अजूनही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशातील अनेक राज्यांनी शाळा बंदच ठेवल्या. केंद्रीय पातळीवर मागील काही दिवसांपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेणं सुरू असून, १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. विशेषतः केंद्र सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारवर सोपवू शकते.
हवाई प्रवासी वाहतूक अंशतः सुरू करण्यात आलेली आहे. ती कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्यानं हवाई प्रवासी वाहतूक विस्तारण्याचा निर्णय तूर्तास टाळला जाऊ शकतो.
जिल्हा, राज्याच्या सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या होऊ शकतात. कारण करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातलेले आहेत. मात्र, याचा आर्थिक व्यवहारांना फटका बसला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानं जिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रानेच सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांना प्रवासी, माल वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिल्यानं राज्याराज्यातील आणि जिल्ह्यांतील प्रवासी वाहतूकीचे मार्ग खुले होण्याची शक्यता जास्त आहे. १ सप्टेंबरपासून हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवर निर्बंध असल्यानं याचा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेच ही बाब राज्यांच्या निर्दशनास आणून दिली असून, त्यामुळे १ सप्टेंबरपासून प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.