वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्याचे सहकार मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाच लाखांच्या वर गेला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी दिवसभरात १०,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख १ हजार ४४२ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के इतके आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १२,६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३६४ मृत्यू झाले. सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मृत्युदर ३.३९% एवढा आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.