वृत्तसंस्था // प्रतिनिधी
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतातूर असलेला बळीराजा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातील झालेल्या पावसामुळे सुखावला आहे. शुक्रवारी (ता.१४) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस, तर उर्वरित बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. येत्या मंगळवारपर्यंत (ता.१८) मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत कोकण, गोव्यात सरासरीच्या तुलनेत ७६ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सरासरीच्या आसपास होता. तर येत्या मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
१ ऑगस्ट ते १४ ऑगस्टपर्यंत राज्यातील पाऊस (मिलिमीटर मध्ये)
भाग : सरासरी पाऊस (मिमी) : प्रत्येक्ष पडलेला पाऊस (मिमी)
मध्य महाराष्ट्र : १०५.८ : १७२.४
मराठवाडा : ८३ : ८१.६
विदर्भ : १४९.९ : १४२.५
कोकण गोवा : ४३०.६ : ७५९.४

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.