टेंभू आणि म्हैसाळयोजनेद्वारे उपसा;सांगोला,मंगळवेढा, पंढरपूरला फायदा
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कृष्णा नदीतून पुढे कर्नाटकात वाहून जाणा-या पाण्यापैकी काही पाणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी भागात पोहोचवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे. सोमवारपासून टेंभू आणि म्हैसाळ या योजनांद्वारे पाणी उपसा सुरू होणार आहे. यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासह सांगली जिल्ह्यातील पुरावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पावसाचे शेकडो टीमएमसी पाणी कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पुढे कर्नाटकात वाहून जाते. पावसाळ्यात यातील काही पाणी दुष्काळी भागात वळवावे, अशी मागणी गेल्या २५-३० वर्षांपासून सुरू आहे. अखेर या मागणीला मूर्त रूप आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनांद्वारे पाण्याचा उपसा केला जाणार आहे. उपसलेले पाणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडले जाईल. कडेगाव, तासगाव, विटा, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या परिसरातील तलावांमध्ये कृष्णेचे पाणी पोहोचणार आहे. पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी उपसा सुरू राहील. या निर्णयामुळे दुष्काळी भागातील पाणी टंचाईचे संकट कमी होणार आहे.
पावसाळ्यात कृष्णेतील पाणी उपसा करण्यामुळे सांगली जिल्ह्यातील पुराचा धोका कमी होणार आहे. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय वारणा आणि राधानगरी धरणातून होणा-या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदीची पूरस्थिती गंभीर बनते. यातच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याता विसर्ग कमी केल्यास सांगलीतील स्थिती आणखी कठीण बनते. पूरकाळात कृष्णेतील उपसा सुरू राहिल्यास पूर नियंत्रणासाठीही याची मोठी मदत होणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.