वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. कंगना रानौत प्रकरणामुळे चिघळलेल्या स्थितीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.
कंगनाच्या मुंबई, महाराष्ट्र विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली असून कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांकडून विमानतळावर आंदोलन करण्यात आलं. कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. सूचना देऊनही आंदोलन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे कंगनाच्या विषयावर बोलू नका, असा सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर कंगना राणौत वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, असंच उत्तर दिलं. 'आज मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो. मी काहीही पाहिलं नाही, मला आज काहीच माहिती नाही,' असं राऊत म्हणाले.
दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. याबाबत बोलताना शरद पवार यांनी कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम कारवाईबाबत फारशी माहिती नसल्याचं सांगितलं. पण सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला आपण संधी देतो, असंही पवार म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.