पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेत व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्या बाधित शेतक-यांचे शेतजमीन, घरे, जनावरे यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, तसेच कृषी मंत्री श्री.दादासाहेब भुसे, मदत व पुर्नवसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.भरणे व जिल्हाधिकारी-सोलापूर यांचेकडे आ.प्रशांत परिचारक यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केली असल्याचे सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील कासेगांव, खर्डी, भाळवणी, चळे, पुळुज, भंडीशेगांव या सर्कलमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वादळीवा-यांसह अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या पिकांचे व नागरिकांच्या घरांचे पडझड होवून पत्रे उडुन गेलेली आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांच्या भिंती पडल्या आहेत व काही ठिकाणी शेतक-यांची जनावरही वीज कोसळल्यामुळे मरण पावली आहेत. तसेच गेली तीन दिवस अतिवृष्टीमुळे नदीवरील, ओढ्यावरील पुल पाण्यामुळे वाहुन गेल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
तसेच मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे खरीप पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे कोविड-१९ या जागतिक महामारीच्या रोगामुळे शेतक-यांच्या पिकांना कवडीमोलाचा भाव मिळत आहे. यामध्ये देखील निसर्गाने घात केल्याने शेतक-यांचे जीवन विस्कळीत झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय सीएलएस- २०१९/प्र.क्र.१७७/म-३ दि.११/९/२०२० नुसार अतिवृष्टी व पूरामुळे शेतपीकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतक-यांना अनुज्ञेय असलेल्या मदती दराच्या तिप्पट दराने येणारी रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता देणेत आली आहे. या पार्श्वभूमीवर त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबत आ.प्रशांत परिचारक यांनी संबंधितांशी संपर्क साधला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.