वृत्तसंस्था // प्रतिनिधी
रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजण्याचे काम चालू आहे, त्यामुळे पुढचे सहा महिने ही बंधने राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जगभर कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जात आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
कोविडसंदर्भात औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागनिहाय जिल्ह्यांच्या आढावा बैठका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतल्या. मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटन आणि अन्य देशांत आता पुन्हा बंधने घालणे सुरू करण्यात आले आहे. आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरीत्या औषधांचा वापर होऊ नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंंगवर भर द्यावा लागणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.