वृत्तसंस्था // प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना दर आठवड्याला शिकवणीचा अहवाल द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा अहवाल असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करावा लागणार आहे. राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा, शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकार तसेच इतर राज्यांसोबत होणा-या बैठकीत सादर करण्यासाठी एमएससीईआरटीने ही माहीती मागवली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षकांकडून हा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी शिक्षकांनी आपला अहवाल सादर करायचा आहे.एमएससीईआरटीने दिलेल्या या सूचनांमुळे शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे आधीच कामाचा व्याप वाढला आहे. त्यातच कोरोनाची टांगती तलवार ही डोक्यावर आहे. त्यात भर म्हणून आणखी एका अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांच्या खांद्यावर टाकल्याचे बोलले जात आहे.
या कामाची नोंद करावी लागणार
- विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे
- फोनच्या माध्यमातून कम्युनिटी क्लासेस चालविणे
- शिक्षक-मित्र तयार करणे
- शाळेमध्ये राबविले जाणार इतर उपक्रम
- किती विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधला, किती तास अभ्यास झाला, शिक्षणाचे माध्यम कोणते याची माहिती द्यावी लागणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.