वृत्तसंस्था // प्रतिनिधी
शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनाचा समाचार घेतला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी कंगनावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. “पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा असेल या ठिकाणी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांचा चक्काचूर झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौत सारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही,” असं शेट्टी म्हणाले.
शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचल प्रदेश सारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडे म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सूचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांचे पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील. हा दिवस फार लांब नाही,” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.