वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो बागांचे नुकसान झाल्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबजारात सोमवारी टोमॅटोची आवक पन्नास टक्क्यांनी घटली. यामुळे कालच्या तुलनेत आज बाजारभावात क्रेटमागे सुमारे तीनशे रुपयांची वाढ झाली. सकाळी झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम ) 400 रुपये ते 1100 रुपयांच्या दरम्यान या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला. टोमॅटो खरेदी विक्रीतून उपबजारात दोन तासांत सुमारे साडेतीन कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली.
याबाबत सभापती संजय काळे यांनी सांगितले की, टोमॅटोचा हंगाम दरवर्षी मार्च ते ऑगस्टदरम्यान भरात असतो. उन्हाळी व पावसळी हंगामात जुन्नर, आंबेगाव तालुक्यात दरवर्षी सुमारे वीस हजार एकर क्षेत्रात लागवड होत असते. या वर्षी मार्चनंतर लॉकडाउन सुरू झाला. देशांतर्गत वाहतूक बंद असल्याने खरेदीसाठी व्यापारी न आल्याने टोमॅटोचा उन्हाळी हंगाम वाया गेला. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्री वादळामुळे टोमॅटोसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जुन्नर, बाजार समितीने नियम व अटींचे पालन करून जून पासून उपबजार सुरू केले. त्यामुळे भाजीपाला, डाळींब उत्पादकाचे काही प्रमाणात नुकसान टळले आहे.
जुलै महिन्यापासून आवक घटल्याने भाजीपाला, डाळींब व टोमॅटोच्या बाजार भावात वाढ झाली. वाढीव बाजार भावाचा फायदा दहा टक्के टोमॅटोच्या उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. रविवारी (ता. ६) उपबजारात अकरा हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला ३०० रुपये ते ७५० रुपये भाव मिळाला होता. मागील तीन दिवस या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आज उपबजारात सुमारे पाच हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. आवक घटल्याने टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांची झुबंड उडाली. त्यामुळे अगदी भुगी टोमॅटो क्रेटला चारशे रुपये, मध्यम प्रतिच्या टोमॅटो क्रेटला ९०० रुपये, तर चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला अकराशे रुपये भाव मिळाला. दोन तासात उपबजारात सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली, असे काळे यांनी सांगितले.
आवक घटल्याने टोमॅटो देण्यासाठी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र उपबजार आवारात दिसुन येत होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बाजार समितीचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी नियम व अटींचे पालन करून उपबजार सुरू ठेवल्याने हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढीव बाजारभावाचा लाभ मिळाला असल्याचे मत टोमॅटो उत्पादक गुणवंत गावडे, उपसचिव शरद घोंगडे, व्यापारी जालिंदर थोरवे, योगेश घोलप यांनी व्यक्त केले.
सुमारे तीन लाख रुपये खर्च करून दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. ऑगस्टमध्ये तोडणी हंगाम सुरू झाला. आजअखेर एक हजार टोमॅटो क्रेटचे उत्पादन निघाले असून, सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून किमान दोन हजार क्रेटचे उत्पादन निघाले. सोमवारी सकाळी उपबजारात टोमॅटोचे 125 क्रेट विक्रीसाठी आणले होते. प्रतवारीनुसार 500 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाला. विक्रीतून 80 हजार रुपये मिळाले, असे शेतकरी गुणवंत गावडे यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.