वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील डाळिंब क्षेत्राला आतंरराष्ट्रीय दर्जा व स्थान मिळवून देण्यासाठी किसान आर्मी व वॉंटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी "डाळिंब क्रांती अभियाना'ची घोषणा केली असून, तीन जिल्ह्यांतील 20 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन 15 कलमी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात तब्बल 85 हजार 509 हेक्टर डाळिंब क्षेत्र असून, त्यापैकी तब्बल 18 हजार 194 हेक्टर डाळिंब क्षेत्र एकट्या सांगोला तालुक्यात आहे. त्या दृष्टीने 15 कलमी कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगोला तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा डाळिंब प्रक्रिया उद्योग आणि देशातील पहिली "डाळिंब बॅंक' उभा करणार असल्याची घोषणा कदम यांनी केली आहे. डाळिंब क्रांती अभियानातील 15 कलमी कार्यक्रमात स्वतंत्र डाळिंब विक्री व्यवस्थापन व माहिती केंद्र उभा करणे, सांगोला येथे डाळिंब संशोधन उपकेंद्र सुरू करणे, नव्याने सोलापूर येथे विकसित होणाऱ्या विमानतळावर डाळिंबासाठी स्वतंत्र कार्गो हब उभारणे, डाळिंब पीकविमा दुरुस्ती धोरण आणणे, सोलापूर जिल्ह्यासाठी कृषी विभागाअंतर्गत स्वतंत्र डाळिंब विकास अधिकारी पद निर्माण करणे, नवीन बॅंकिंग धोरण व व्यवस्था निर्माण करणे, खतामध्ये होणारी फसवणूक थांबविण्यासाठी डाळिंब क्षेत्रात स्वतंत्र नियंत्रण व भरारी पथक नेमणे, डाळिंब भवन उभारणे आदी महत्त्वपूर्ण उद्दिष्टांचा समावेश आहे. डाळिंब क्रांती अभियानाची 15 उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची 15 कृती गट स्थापन करणार असून, राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून या उद्दिष्टांच्या माध्यमातून डाळिंब क्षेत्राला जागतिक पातळीवर वैभवाचे स्थान व दर्जा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.