सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेची मुख्यसभा तहकूब केल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं आहे. संतापलेल्या कॉंग्रेस, वंचित आघाडी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी चक्क महापालिका आयुक्तांची खुर्चीच पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे. वारंवार सभा तहकूब केल्याने संतापलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी थेट खुर्चीच पळवून नेत महापौरांच्या दालनात नेऊन ठेवली. याचा लाईव्ह व्हिडिओही समोर आला आहे.
अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित असतानादेखील जाणीवपूर्वक सत्ताधारी आणि महापालिका आयुक्त सभा तहकूब करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे त्यांना श्रध्दांजली वाहून ही सभा तहकूब केली असल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिलं आहे.
या घटनेमुळे संपूर्ण सभागृहात खळबळ उडाली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अशी जुंपल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरंतर कोरोनाच्या संकटामुळे राज्य आणि प्रत्येक नागरिक मेटाकुटीला आला आहे. अशात पालिकेने वेळीच योग्य ते निर्णय घेत आणि कोरोनाचा धोका कसा टाळता येईल यासाठी एकत्र येत काम करणं सामान्य नागरिकांना अपेक्षित आहे. पण प्रकार निवडून दिलेले नेतेच गोंधळ घालत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
कोरोनाच्या या जीवघेण्या संकटात आधीच सगळी व्यवस्था पणाला लागली असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं मात्र पक्षीय राजकारण सुरू असल्याचं दिसतं. एकीकडे राज्यात कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर विरोधक पेटून उठले आहेत. त्यात आता कुठेतरी ठाकरे ब्रॅडवरून राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशात ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलास होत असनाता नागरिकांच्या हिताच्या बाबी मात्र लांबच राहिल्याचं दिसतं. त्यामुळे मोठ्या विश्वासाने नेत्यांना आणि अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पार पाडावी अशी नागरिकांची इच्छा आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.