वृत्तसंस्था // प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील पीडित मुलीवरील अत्याचाराबाबत उत्तर प्रदेश सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. तेथे कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही. देशभरातून या घटनेबाबत तीव्र संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत, ती योग्यच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर सामूहिक बलात्कार करून क्रूर हत्या करण्यात आली. तेथील पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अंत्यदर्शन घेऊ न देता रात्रीतून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेबाबत देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पवार म्हणाले, ''पीडित मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या हातात न देता संमतीशिवाय परस्पर विल्हेवाट लावणे, हे देशात कधी पाहिले नव्हते. उत्तर प्रदेशात सध्या कायदा हातात घेऊन जी टोकाची भूमिका घेतली जाते याबाबत देशातून तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी भेटायला गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही.या लोकप्रतिनिधींना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यावरून उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे किंवा मूलभूत अधिकार आहेत, यावर आता विश्वास राहिलेला नाही. या घटनेबाबत देशातून ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या योग्यच आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.