सोलापूर // प्रतिनिधी
परतीच्या पावसाने तूर, कापूस, कांदा, केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीपोटी दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्हानिहाय पंचनाम्याचा अंतिम अहवाल राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाला पाठविण्यात आले आहेत. राज्यातील 45 लाख हेक्टरवरील शेती पिकांसाठी चार हजार 985 कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत (दिवाळीपूर्वी) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वर्ग करण्याच्यादृष्टीने नियोजन सुरु झाले आहे.
राज्यातील 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका सोसावा लागला. नुकसानीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आदींनी दौरे केले. राज्याची आर्थिक परिस्थिती विस्कटल्याने राज्य सरकारने मदतीची घोषणा करताना सावध पवित्रा घेतला. मात्र, विरोधकांची आक्रमकता आणि शेतकऱ्यांची नाराजी पाहून राज्य सरकारने मदतीची घोषणा केली. त्यानंतर तत्काळ पंचनामे अहवाल मागविण्यात आले. आता तालुकानिहाय नुकसानीचा आढावा घेतला जात असून भरपाईची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्यादृष्टीने नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.