वृत्तसंस्था // प्रतिनिधी
किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर एकदाचे काय ते सर्व आरोप करून घ्यावेत. दिवाळीनंतर शिवसेना त्यांच्यावर कोणते आरोप करते ते पाहाच आणि तेव्हा किरीट सोमय्या यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास तयार राहावे, असा गर्भित इशारा राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिला. किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका एकदा संपू द्या. आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य सापडलेले नाही. शिवसेना त्यांच्या प्रत्येक आरोपाची चिरफाड करेल, असे अनिल परब यांनी सांगितले.
मात्र, किरीट सोमय्या यांनी आता आमच्या आरोपांसाठी तयार राहावे. सध्या दिवाळीचे दिवस आहेत. एकदा दिवाळी झाली की शिवसेना किरीट सोमय्यांवर कसे आरोप करते ते पाहाच. तेव्हा मात्र किरीट सोमय्या यांनी उत्तर देण्यासाठी तयार राहावे, असे अनिल परब यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना किरीट सोमय्या यांच्याविरोधात नक्की कोणते सत्य समोर आणणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेत शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.