महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक अन्न घोटाळा
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
जिल्ह्यातील नायगाव (बा)येथील एम.आय.डी.सि.येथे सन 2018 मध्ये शासनाचे धान्य इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीमध्ये पाठवले जाण्याचा मोठा गोरख धंदा उघडकीला आला होता.त्यात असंख्य मोठ्या लोकांसह जवळपास 20 लोकांना अटक झाली होती.त्यात आज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तीन जणांना अटक केली आहे.
इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी कृष्णूर येथे दि.19 जुलै 2018 रोजी तत्कालीन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकली. तेथे दहा ट्रक सरकारी धान्य पकडले गेले.त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 108/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 120 (ब) नुसार दाखल झाला. यामध्ये सर्वप्रथम 11 ड्रायव्हरला अटक झाली.त्यानंतर इंडिया मेगा ऍग्रोचे संचालक अयज बाहेती,व्यवस्थापक प्रकाश तापडीया,वाहतुक ठेकेदार राजू पारसेवार,जगजितसिंह खुराणा यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक गोदामपाल, खोट्या बिलांवर माल पुरवठा करणारे अनेक व्यक्ती यांना अटक झाली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्याकडे देण्यात आला होता.यानंतर या गुन्ह्यासाठी भरपूर प्रकारे वेगवेगळे अर्ज, वेगवेगळे कायदे जोडण्यात आले आणि हा गुन्हा चर्चेचा ठरला.
सुरूवातीला नायगाव न्यायालयाने याप्रकरणात कोणालाच जामीन दिला नाही. जिल्हा न्यायालयाने सुध्दा जामीन नाकारले पण उच्च न्यायालयाने प्रत्येक आरोपीला कांही रक्कम भरून जामीन दिले.एकूण रक्कम लाखो रुपयांची आहे. त्यानंतर हा गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाला. त्यांनी सुध्दा कांही लोकांना अटक केली आणि पुढे या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले. तरीही या गुन्ह्याचा तपास सुरूच होता आणि हा गुन्हा सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधिक्षक एम.आर.खाडे आणि त्यांचे सहकारी पोलीस शिवाजी नाईक, सांगळे,वाठोरे,संजय रामदिनवार, चिन्नमवार आदींनी हिंगोली येथील पांडूरंग राठोड, नांदेड येथील दयानंद अहिरे आणि कपिल विजय पोकर्णा या तिघांना अटक केली आहे.
या पकडलेल्या तिघांवर खोट्या बिलाच्या आधारे शासकीय धान्य इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या तपासात पुढे उद्या दि.22 डिसेंबर रोजी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 2018 पासून सुरू असलेला हा सरकारी धान्य घोटाळा विषय आता तीन लोकांना अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी ही एक मोठी कंपनी आहे. ज्यामध्ये हजारो लोकांना रोजगार आहे आणि त्यातून नवीन विविध वस्तूंचे उत्पादन करून त्यांची विक्री करणे हा मुख्य व्यवसाय आहे. त्याकाळी कंपनीसाठी लागणारा गहु आणि तांदुळ शासकीय गोदामातला खरेदी केला गेला आणि या कंपनीची पत वाया गेली.आता नवीन तीन अटक असलेल्या व्यक्तींकडून नवीन काय पुरावे समोर येतील हे भविष्यातील कार्यवाही नंतर स्पष्ट होईल.
कंपनीचे संचालक अजय बाहेती यांनी आपली जामीन झाल्यानंतर महतप्रयासाने ही कंपनी पुन्हा सुरू केली आहे.ज्यात विविध प्रकारच्या नवीन वस्तू त्यांनी उत्पादीत केल्या आहेत आणि त्याची बाजारपेठ उपलब्ध करून घेतली आहे.अजय बाहेती यांच्याशी संपर्क साधला असतांना त्या काळी झालेली घटना एक चुकीचा प्रकार होता आणि त्यासाठी आम्हाला भरपूर कांही भोगावे लागले होते असे ते सांगतात.यापुढे मात्र सर्व कारभार अत्यंत काटेकोरपणे आणि कायदेशीर रित्या चालवणार असल्याचे अजय बाहेती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.