सोलापूर // प्रतिनिधी
अतिवृष्टी, महापूर आणि त्यानंतर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून यावर्षी जिल्ह्यातील 40 पैकी 30 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. ऊस तोडणी मजूर आणि वाहतूक यंत्रणा स्थिर झाल्याने गाळप हंगामाला गती आली आहे. 14 डिसेंबरअखेर जिल्ह्यात सुमारे 42 लाख टन ऊस गाळप झाले असून 40 लाख 70 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
थंडीचे प्रमाण कमी असल्याने साखर उतारा सरासरी 8.30 टक्के इतका आहे.दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील येथील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने राज्यात आजअखेर 6 लाख 30 हजार टन ऊसाचे सर्वाधिक गाळप करुन आघाडी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असल्याने किमान 1 कोटी 50 लाख टन उस गाळप होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
यावर्षी अतिवृष्टी, त्यानंतर महापूर आणि कोरोनाच्या सावटीखाली सुरु झालेल्या साखर कारखान्याना गाळप हंगाम सुरु करताना अनेक अडचणी व समस्यांना तोड द्यावे लागले. सगळ्या अडचणींना सामोरे जात जिल्ह्यातील साखर उद्योग पुर्वी सारखा मानाने उभा राहिला आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण 40 कारखाने आहेत. त्यापैकी 10 कारखान्याने अद्याप सुरु झाले नाहीत. उर्वरित 30 कारखाने सुरु झाले आहेत. 14 डिसेंबरअखेर या सर्व कारखान्यांनी सुमारे 42 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. गाळप हंगामाला वेग आला असून कारखान्यांच्या दैनंदिन गाळप क्षमता देखील वाढू लागली आहे.
गाळप हंगाम सुरु होवून महिना उलटत आल्याने जिलह्यातील साखर कारखान्यांनी 1900 ते 2200 असा पहिला हप्ता जाहीर केला आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी 2 हजार 500 रुपयांची पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी सुरवातीला आंदोलनेही झाली. आता काही प्रमाणात आंदोलनाची धग कमी झाल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम सुरळीत सुरु झाला आहे.
साखर सहसंचालक पांडुरंग साठे म्हणाले, जिल्ह्यातील 30 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. 14 डिसेंबरअखेर सुमारे 41 लाख टन उसाचे गाळप झाले असून 40 लाश 70 हजार क्विंटल साखर उत्पादन झाल आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.