वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी सहा दरम्यान संचारबंदी करण्यात आली आहे. त्यासह आता शहरात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश आज सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. संचारबंदीचे आदेश असतानाही शहरात शुक्रवारी (ता. 25) ख्रिसमस साजरी करण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. पोलिसांच्या आवाहनानंतर मात्र गर्दी ओसरली होती. ख्रिसमसप्रमाणे नववर्ष स्वागतासाठी येत्या गुरुवारी (ता.31) शहरातील वेगवेगळ्या भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कायम असताना सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी विचारात घेऊन यापूर्वीच रात्र संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते.रात्र संचारबंदीच्या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र, दिवसा शहरातील सर्व व्यवहार सुरळीत राहतील. एखाद्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत हवी असल्यास त्याने वैद्यकीय कागदपत्रे जवळ ठेवावीत. पोलिसांकडून त्यांची अडवणूक होणार नाही. शहरात पाच जानेवारीपर्यंत रात्र संचारबंदीचे आदेश लागू आहेत. या कालावधीत नागरिकांनी रात्रीचा प्रवास टाळावा. बाहेरगावाहून येणा-या नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून सायंकाळपर्यंत इच्छित स्थळी पोचावे, असे त्यांनी सांगितले.
- संचारबंदीसह शहरात जमावबंदीही लागू
- पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी सहा दरम्यान जमावबंदी
- वैद्यकीय कागदपत्रे जवळ असल्यास अडवणूक होणार नाही
- पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास होणार कारवाई
- रात्रीचा प्रवास टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.