वृत्तसंस्था // प्रतिनिधी
रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केलीय. ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्र रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोतांनी सोडलंय. ते सांगलीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
”पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.
सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. येत्या 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
चार टप्प्यात यात्रा, या ठिकाणी सभा
एकूण तीन दिवस ही यात्रा सुरू राहणार असून चार टप्प्यात ही यात्रा पार पडेल. पहिल्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांची यात्रा असणार आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ असे संपूर्ण राज्यात ही यात्रा पुढील टप्प्यात असणार आहेत. यावेळी शिरोळ, इचलकरंजी, पेठ वडगाव आणि इस्लामपूर येथे सभा घेण्यात येणार आहे. या सभांना भाजप आणि भाजप युतीतील मित्र पक्षांना बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप नेते सारथी?
दरम्यान, खोत यांच्या या यात्रेवर टीका होऊ लागली आहे. या यात्रेची सुरुवात भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते आणि सांगता चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. भाजप नेतेच या यात्रेचे अप्रत्यक्षपणे सारथी झाल्याने त्यावर टीका होत आहे.
दिल्लीतील आंदोलन दलालांचं
यावेळी खोत यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली. दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांचं नाहीच. हे आंदोलन दलालांचं आहे. राजकीय स्वार्थासाठी काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवण्याचा यामागे खटाटोप आहे, अशी टीका खोत यांनी केली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.