सोलापूर // प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षामधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणाशी संबंधित ईडी या नेत्यांची चौकशी करत आहे. या साऱ्यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार यांनीही आज भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. ‘ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,’ असं ते म्हणाले.
याशिवाय, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे.
आम्ही लोकप्रतिनिधी असतो तेव्हा शेतकरी फोन करत असतात. तीन महिने झाले व्यापाऱ्याकडून पैसे नाही आले, हा व्यापारी दर कमी देत आहे वैगेरे तक्रार करतात. तेव्हा आम्ही त्या एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांशी बोलून विषय सुटतो का यासाठी प्रयत्न करत असतो,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.