सोलापूर // प्रतिनिधी
राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार 297 कोटींची मदत दिली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील दोन हजार 211 कोटींची मदत जानेवारीअखेर वितरित केली जाणार आहे. त्यादृष्टीने मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांसह त्यांच्या क्षेत्राची जिल्हानिहाय माहिती संकलित केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली.
दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला यंदा परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्ज काढून बळीराजाला मदत केली. पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना काळात संकटाचा सामना करीत जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून वितरित होणारी मदतीची रक्कम कोणत्याही बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करु नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे अतिवृष्टीच्या भरपाईसाठी रक्कम मंजूर झाली. त्यानंतर जिल्हानिहाय मदतीपासून वंचित शेतकरी व त्यांचे क्षेत्र याची माहिती संकलित करुन त्यांच्यासाठी मदतीची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पुढील आठवड्यापर्यंत वितरित केली जाईल, असेही मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान व भरपाई
बाधित शेतकरी - 62.17 लाख
मदत न मिळालेले अंदाजित शेतकरी - 29.82 लाख
मदतीचा पहिला हप्ता - 2,297 कोटी
मदतीचा मिळणारा दुसरा हप्ता - 2,211 कोटी
केंद्राकडे भरपाईचा प्रस्ताव - 3,721 कोटी

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.