माझे एका चुकीमुळे ग्रामपंचायतची जागा गमावली धैर्यशील मोहिते-पाटील



सोलापूर // प्रतिनिधी 

अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्यावर सोपवली होती. त्यात केवळ आपल्या चुकीमुळे एक जागा बिनविरोध झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे केली.     येथे आयोजित पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते- पाटील म्हणाले, विजयसिंह मोहिते-पाटील गटाची अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते- पाटील, जयसिंह मोहिते- पाटील व मोहिते- पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आपणावर सोपवली होती. गेल्या 13 वर्षांपासून आपण दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आलो आहोत; परंतु आपल्या काही अडचणींमुळे अकलूज ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज भरताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. पाच नंबर प्रभागात सर्वसाधारण महिला गटासाठी एका सामान्य फळ विक्री करणाऱ्या महिलेची उमेदवारी दिली होती. मात्र, आपल्या नावावर बागवान नावाचा एक इसम त्या महिलेकडे जाऊन दोन कागदांवर संबंधित महिलेच्या सह्या घेतल्या आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. तर संबंधित महिला उमेदवाराच्या पूरक अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाला. त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनेलचा उमेदवार राहिला नाही. प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही सर्वस्वी जबाबदारी मोहिते- पाटील गटाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रमुख म्हणून आपली आहे. झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेत आहोत. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचा प्रचार 15 जानेवारीपर्यंत आपण ताकदीने करू. त्यांना निवडून आणू. मगच राजकारणातून बाहेर पडू, असेही त्यांनी जाहीर केले. वास्तविक, अकलूज, महाळुंग व नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया थांबवावी यासाठी प्रयत्न केले. त्यात महाळुंग ग्रामपंचायतीला यश आले. अकलूजमधील सर्व गटांशी अगदी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बोलणी केली. यात प्रमोद कुलकर्णी, नामदेव वाघमारे, दत्ता पवार, नंदू केंगार, किरण मोरे, किरण भोसले, भारत गायकवाड आदींनी सर्वसामान्य जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला; परंतु काही लोकांनी प्रतिसाद न दिल्याने निवडणूक लागली. ही निवडणूक सर्व ताकदीने लढू व सर्व उमेदवार निवडून आणू, अशी ग्वाही या वेळी मोहिते-पाटील यांनी दिली. अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते- पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी धैर्यशील यांच्यावर सोपवली होती. तर यांच्या गटाच्या विरोधात धवलसिंह मोहिते-पाटील यांचा गट देखील या निवडणुकीत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत विरोधी गटाला केवळ दुर्लक्ष आणि चुकीमुळे एक जागा बिनविरोध निवडून गेल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. परिणामी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यानिमित्ताने अकलूज आणि माळशिरस तालुक्‍याचे राजकारण देखील आगामी काळात वेगळ्या वळणावर जाऊ शकते. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget