सोलापूर // प्रतिनिधी
वकिली व्यवसायातून शेतीचा छंद जोपासत लागवड केलेल्या शेवगा पिकाचे चांगले उत्पन्न घेण्याचा संकल्प मनात ठेवून मंगळवेढ्यातील माळरानावरील शेवगा थेट दुबईला पाठवून इतर शेतकऱ्यांसमोर प्रामाणिकपणे कष्ट केल्यास चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून दिले मंगळवेढ्यातील ऍड. धनजंय हजारे यांनी.
ऍड. हजारे यांच्या मालकीच्या जमिनीत इतरही पिके घेतली जात होती पण उत्पन्न कमी, खर्च जादा अशी परिस्थिती होती. त्यातून काही वेगळं करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. परंतु अनेकांनी ही जमीन खडकाळ असल्यामुळे द्राक्ष पिकासाठी जमीन चांगली आहे, त्यामुळे द्राक्ष लावा, असा सल्ला दिला. परंतु वातावरणाच्या लहरीपणामुळे द्राक्ष पिकांना लागणारा खर्च व त्याचे उत्पन्न याचा मेळ बसणार नाही, तोटा होईल या विचाराने ऍड. हजारे यांनी शेवगा पिकाची निवड केली. सहसा शेवगा पिकाला जास्त खर्च व देखभाल जास्त करावी लागत नाही, अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. परंतु त्यातून चांगल्या उत्पन्नासाठी पिकाकडे चांगले लक्ष देऊन फवारणी व खते वेळेत द्यावी लागतात.
यासाठी "ऍग्रोवन'चा नियमित वाचक असल्याने त्यामध्ये आलेले शेवगा पिकासंदर्भातील लेख वाचण्यात आले. त्यामुळे शेवगा हे पीक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे पीक आहे, याची खात्री झाल्यामुळे शेवग्याची निवड करून चार एकर शेवग्याची लागवड केली. हे पीक व्यापारी जागेवरून घेऊन जातात, असे एकमेव पीक आहे; परंतु जागेवरचा दर आणि बाजारपेठेतील दर यात तफावत आहे, याची चौकशी केल्यानंतर समजून आले. काही व्यापारी शेवग्यावर दोन इंच देठ ठेवून शेवगा थोडा व सरळ शेंगा असेल तर दर जास्त देतो, असे म्हटल्यामुळे चौकशी केली, की अशा शेंगाला जास्त दर का? त्या वेळी असे समजले की हा शेवगा सरळ आणि वर देठ असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे.
थेट एक्स्पोर्ट कंपनीशी संपर्क करावा म्हणून मंगळवेढ्यातील आरती डोंगरे यांनी काही शेवगा एक्स्पोर्ट कंपनीचे पत्ते दिले. त्याप्रमाणे बऱ्याच कंपन्यांशी हजारे यांनी संपर्क केल्यावर नवी मुंबई येथील संदीप यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर शेवगा घेण्याचे मान्य केले. पहिल्यांदा 50 किलो शेवगा चाचणीसाठी थेट नवी मुंबई येथे ट्रॅव्हल्समधून पाठवले. त्याच्या चाचणी होऊन हजारे यांनी उत्पादित शेवगा परदेशात पाठवण्यासाठी पात्र ठरल्यानंतर त्यांना अधिक शेवगा पाठवण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार 500 किलो शेवगा दुबईला पाठवला. आता मंगळवेढ्याबरोबर ब्रह्मपुरी, उचेठाण, बठाण येथील इतर शेतकऱ्यांनी एकत्र येत एकाच वाहनातून त्या कंपनीला व्यापारी किंवा मधला दलाल वगळून थेट शेतकरी ते एक्स्पोर्ट कंपनी असा शेवगा शेतकरी पाठवू लागले. दर शनिवारी त्या शेतकऱ्यांत दोन टन शेवगा परदेशात जाणार आहे.
शेवग्याच्या विक्रीत स्थानिक बाजारपेठ, व्यापारी यांच्यापेक्षा 20 ते 25 रुपये जादा दर मिळू लागल्यामुळे शेवगा हे नगदी पीक जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पीक असल्याचे दिसून आले. पिकाला कोणत्या बाजारपेठेत चांगला भाव मिळतो ती बाजारपेठ शोधून त्या बाजारपेठेत पिकवलेला माल पाठवला तरच चांगला दर मिळतो म्हणून जे बाजारात विकते ते शेतकऱ्यांनी शेतात पिकवलं पाहिजे. हे ठरवताना शेतकऱ्यांसाठी शेतकरी कंपनी निर्माण करणार आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.