सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेचे कामती गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे खताळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खताळ हे सोलापूर - पुणे महामार्गावरील लांबोटी जवळील जयशंकर हॉटेलचे मालक होते. त्याच ठिकाणी त्यांचे निवासस्थान असल्याने ते सकाळी उठून झोपाळ्यावर बसले, तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
मृत्यूसमयी त्यांचे वय 55 होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुले व नातवंडे असा परिवार आहे. लांबोटी गावचे ते दहा वर्षे सरपंच होते. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे ते कट्टर समर्थक होते. भीमा लोकशक्ती परिवार गटातून ते जिल्हा परिषद कामती गटातून विजयी झाले होते.
जयशंकर हॉटेल, लांबोटी चिवडा आणि चहासाठी त्या मार्गावरील प्रसिद्ध असे हॉटेल आहे. तानाजी खताळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई यांनी मोठ्या कष्टातून ते हॉटेल उभे केले आहे. रुक्मिणीबाई खताळ यांचा मोठा मुलगा तानाजी गेल्याने खताळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.