महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला मात्र फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिला पाहिजे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे येणे; त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परामबीर सिंग यांनी 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा केलेला आरोप हा महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारा होता. तेंव्हाच गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. आज मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांची सीबीआय चौकशी लावल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी राजीनामा द्यायला फार उशीर केला आहे. उशिरा का होईना राजीनामा दिला हे स्वागतार्ह आहे मात्र विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते हेच यातून निष्पन्न होत आहे.महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. कोरोना ची स्थिती भयानक वाढली आहे.त्यावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार कमी पडले आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाची अवस्था वाईट आहे.राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता आम्ही या आधी मागणी केली होती की महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ही आमची मागणी योग्य आहे. राज्यात बिघडलेली परिस्थिती पाहता आणि गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी सुरू झाल्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.