सोलापूर // प्रतिनिधी
उजनी धरणाचे 5 टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला नेण्याच्या निषेधार्थ तीर्थक्षेत्र पंढरपूर नामदेव पायरी येथे शुक्रवार दिनांक 21/05/2021 रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, आ.प्रशांत परिचारक, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.राजेंद्र राऊत, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, आ. समाधान आवताडे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयतक्रांती संघटनेचे दिपक भोसले, आरपीआयचे अध्यक्ष जितेंद्र बनसोडे, रासपचे रणजित सुळ यांच्या उपस्थितीत होणार होते.
सध्या सोलापूर जिल्ह्यात कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असून रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात व ग्रामीण भागात कडक लॉकडाऊ न जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला सहकार्य करावे व उजनी धरणाचे 5 टीएमसी पाणीसाठीचे आंदोलन थांबवावे अशी विनंती जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासनाने भाजपा व मित्रपक्षाचे पदाधिकारी यांना केली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे व मित्र पक्षाचे खासदार आमदार यांच्याशी चर्चा करून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे नामदेव पायरी जवळ उद्या शुक्रवार 21/05/2021 रोजी होणारे सोलापूर जिल्हा परिसरातील शेतकरी बांधवाच्या हितासाठी करीत असलेले लाक्षणिक धरणे आंदोलन प्रशासनाचे विनंती व कोरोना सदृष्य परिस्थितीमुळे स्थगित करत आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक व भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली.
परंतू ना.जयंत पाटील यांनी शासनाने उजनी धरणाचे पाण्यासंदर्भात काढलेला आदेश रद्द केला अशी फसवी घोषणा केली आहे. त्यामुळे याबाबत जो पर्यंत मा.मुख्यमंत्री व कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होत नाही तो पर्यंत हे धरणे आंदोलनाचा विचार भाजप व मित्रपक्षाव्दारे पुन्हा केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष हे आंदोलानची पुढील तारीख लवकरच जाहीर करणेत येईल अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.